बेल्हे येथील समर्थ शैक्षणिक संकुलामध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा
बेल्हे -( दि २६) विजय चाळक

समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स,बेल्हे येथील शैक्षणिक संकुलात २६ नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात आला.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस फुले व पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी प्रा.राजीव सावंत यांच्या शुभहस्ते संविधान स्तंभाचे पूजन करण्यात आले.विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थ्याने प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करून अभ्यासामध्ये विशेष प्राविण्य मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रा.राजीव सावंत यांनी सांगितले
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील,एम बी ए चे प्राचार्य प्रा.राजीव सावंत,बी सी एस चे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप,पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.अनिल कपिले,प्रा.संजय कंधारे,प्रा.प्रदीप गाडेकर,आय टी आय चे प्राचार्य पांडुरंग हाडवळे,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.वैभव आहेर,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,एम बी ए चे डॉ.महेश भास्कर,प्रा.रुस्तुम दराडे,प्रा.शशिकांत ताजणे आदी मान्यवर उपस्थित होते.*
*आज संपूर्ण देशभरात संविधान दिवस साजरा केला जात आहे.समर्थ संकुलात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान दिनाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.*
*जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारताने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाचा स्वीकार केला होता. तर २६ जानेवारी १९५० पासून संविधान लागू करण्यात आले होते. संविधानाबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी देशभरातील शाळांमध्ये संविधान दिवस साजरा केला जातो.मूलभूत अधिकारांची संकल्पना अमेरिकन संविधानातून; हक्क, समता व बंधुता संकल्पना फ्रेंच संविधानातून; आयरिश संविधानातून राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे, तर जर्मनी संविधानातून आणीबाणी तरतुदी याप्रमाणे विविध विषयातून प्रेरणा घेऊन भारतीय संविधान तयार केले गेले आहे.*
*भारताची घटना निर्माण करण्यासाठी घटनाकर्त्यांनी जगातील जवळपास ६० देशांच्या घटनांचा विचार केला. घटननिर्मितीसाठी २वर्षे, ११ महिने व १८ दिवसांचा कालावधी लागला.(अमेरिकेची घटना चार महिन्यात तयार झाली होती.) या कालावधीत घटना समितीने ११ सत्रात १६६ दिवस तर मसुदा समितीने १४१ दिवस काम केले. घटनानिर्मितीसाठी एकुण ६३ लाख ९६ हजार ७२९ रुपये खर्च आला.भारतीय राज्यघटनेचे मुळ इंग्रजी हस्तलिखित सुंदर आणि वळणदार अक्षरात दिल्लीच्या प्रेमबिहारी नारायण रायजादा (सक्सेना) यांनी लिहले.हिंदी मुळ हस्तलिखित वसंत वैद्य यांनी लिहले.त्याला नंदलाल बोस यांनी आकर्षक असे नक्षीकाम केले.भारतीय संविधानाची इंग्रजी व हिंदी मुळ प्रत भारतीय संसदेच्या लायब्ररीत हेलियम पेटीमध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहे.भारतीय संविधानाची हिंदी व इंग्रजी प्रत देहरादुन येथे छापण्यात आली.*
*संविधान म्हणजे भारताचा आत्मा,भारतीयांची अस्मिता,भारताची शान,मान, सन्मान प्राण.या संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लोकशाहीला संविधानरूपी अलंकाराने सजवले.संविधान हेच भारताच्या सहिष्णुतेचे व राष्ट्रीय एकात्मकतेचे गमक आहे.भारतातील नागरिकांचा न्याय,समता,स्वातंत्र्य, आणि एकजूट यांचे रक्षण कारण्यासाठी संविधानातून स्वतंत्र,साम्यवादी, धर्मनिरपेक्ष,स्वायत्त,प्रजासत्ताक राज्य बनवण्यासाठी तरतुदी केलेल्या आहेत.या सर्वांची माहिती व जाणीव आजच्या विद्यार्थ्यांना व्हायला पाहिजे म्हणून खऱ्या अर्थाने हा संविधान दिवस शाळा महाविद्यालयातून साजरा होत असतो असे मत वल्लभ शेळके यांनी मांडले.यावेळी संविधानाची प्रतिज्ञा घेण्यात आली.उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टनसिंग चे नियमावलीचे अवलोकन करत यात सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी तर आभार डॉ.महेश भास्कर यांनी मानले.*