स्नेहमेळाव्याच्या निमीत्ताने पंचवीस वर्षांनंतर भरली कळमजाईच्या डोंगरवरती शाळा

वडगाव आनंद -( दि ३) प्रतिनिधी
पंचवीस वर्षांपूर्वी दहावीत असणारे विद्यार्थी आज पुन्हा शाळेतील आठवणी जागवत एकत्र आले.जुने किस्से, शाळेत शिक्षकांनी केलेली शिक्षा, छोट्याशा गोष्टींवरुन एकमेकांशी झालेले वाद आणि पुन्हा झालेली गट्टी या साऱ्या गोष्टींना उजाळा देताना कधी हास्याच्या लकेरी तर कधी ओलावलेल्या डोळ्याच्या कडा जमलेल्या सर्वांनाच शालेय जीवनातील मंतरलेल्या दिवसांची पुन्हा एकदा अनुभूती देवून गेली.
श्रीमती रेऊबाई बाळाजी देवकर विद्यालय वडागांव आनंद येथून सन १९९५-९६ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवार दि.३०आॅक्टोंबर २०२२ रोजी सकाळी दहा वाजता मोरदरा येथील हिरवाईने नटलेल्या डोंगराच्या निसर्गरम्य कळमजाई मंदीर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला.या माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यास सुमारे ४५ माजी विद्यार्थी उपस्थित होते.मुलींची संख्याही लक्षणीय होती.
सकाळी १० वाजता माता कळमजाईच्या दर्शनाने आणि दिपप्रज्वलनाने या स्नेहमेळाव्याची सुरुवात झाली.तसेच शालेय शिक्षकांपैकी व शालेय जीवनातील सहकारी मित्रांपैकी दिवंगत झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.नंतर उपस्थितांपैकी प्रत्येकाने आपल्या मनोगत मांडताना स्वपरिचय करून देत सुखदुःखाचे प्रसंग व आजवरची वाटचाल तसेच शाळेतले जुने किस्से अनुभव कथन करत कवितांनी ही या स्नेहमेळाव्याची रंगत वाढवली.काही जणांनी शाळेमध्ये शिक्षकांनी मारलेल्या छडीमुळेच आज आम्ही यशस्वी होवून घडू शकलो अशा भावना व्यक्त केल्या.
स्वागताला कांदा व पालकभजांवर मारलेला ताव व
नंतर स्नेहभोजनात असणाऱ्या लज्जतदार मेनूंसह बासुंदीच्या गोडीने या मेळाव्यातील मैत्रीचा गोडवा अधिक वाढवला.ही जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीसह पुढील स्नेहमेळाव्याच्या आयोजनाची आस मनात ठेवून प्रत्येकजण लवकरच पुन्हा भेटण्याचा शब्द देत घरी परतला.
स्नेहमेळाव्याच्या आयोजन व यशस्वीतेसाठी प्रयत्न केल्याबद्दल गोपीनाथ शिंदे,गोरक्षनाथ पाटील देवकर, सचिन काशिकेदार, सतिश चासकर,शंकर गडगे,सतिश वाळुंज व शितल कुटे सुपेकर यांचे सर्वांनीच आभार मानले.